फलटण.. जिल्ह्यात सध्या 36 गावे व 236 वाडी वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे . पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले , टंचाई निवारणार्थ टंचाई निवारणाचे अधिकार प्रांतांधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही वाडीवस्तीला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी , यासाठी मिशन मोडवर काम करावे , आवश्यक तेथे कुपनलिकांची कामे हाती घेण्यात यावी . ज्या विहिरींमध्ये गाळ साचला असेल तेथे गाळ काढण्याची कामे यध्दपातळीवर करावीत . टंचाई काळात कामात हलगर्जी करणाऱ्या यंत्रणा , अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी . ज्या ठिकाणी टँकरसाठी मागणी येईल त्याठिकाणी त्वरीत मंजूरी देऊन पाणी पुरवठा सुरु करावा , टँकरना जीपीएस टँगीग करावे . नगरपालिकांच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरुन घ्याव्यात , आवश्यक तेथे विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात . जनावरांसाठी चारा पुरेसा उपलब्ध राहील याची तजवीज करावी . एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत , असे निर्देश पालकमंत्री श्री . देसाई यांनी दिले . यावेळी त्यांनी जल जीवन मिशन , प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनांची कामेही लवकरात लवकर पुर्ण करुन योजना कार्यान्वित कराव्यात , असेही निर्देशित केले .



