फलटण:- जम्मू – काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य आहे . अशा निर्णयात सर्वपक्षीय सरकारसोबत असले पाहिजेत , परंतु सरकारने कोणताही निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी , असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष , माजी केंद्रीय संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले . ते आंबोली नांगरतास येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते . यावेळी त्यांनी पर्यटकाला धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य असल्याचे सांगितले . पवार गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . शुक्रवारी त्यांनी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकांशी चर्चा केली . त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले . यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले , जिल्हा बँक माजी संचालक व्हिक्टर डान्टस , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही . बी . पाटील , ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते
पवार म्हणाले , मी गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे . गुरुवारी वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली . तेथे काजूवर नवनवीन प्रक्रिया उद्योग उभे राहत आहेत , ही भूषणावह बाब आहे . काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे , हेही तपासून घेतले पाहिजे . संशोधनाचे काम चांगले सुरू आहे . जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली . ते म्हणाले , धर्म विचारून एखाद्या पुरुषाला मारणे म्हणजे परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे . जे काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात , त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नाही . पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती . या बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवण्यात आले होते . त्यामुळेच सरकार जो काही निर्णय घेईल , त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि सर्वजण सरकारसोबत आहोत . कारण हा हल्ला भारतावर झालेला आहे . त्यामुळेच सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे . परंतु , सरकारने
पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे आणि को निर्णय घेतल्यास तो तडीस न्यावा , असे आवाहन पवार यांनी केले . पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर काही निर्बंध लादले आहेत . परंतु , हे निर्बंध लादताना सरकारने थोडा विचार केला पाहिजे . भारताची विमानसेवा जर पाकिस्तानमधून जात असताना बंद केली , तर त्याचा परिणाम भारतावरच होईल . असे अनेक निर्णय आहेत , परंतु यातून पाकिस्तानलाही एक संदेश जाईल , असे पवार म्हणाले



