फलटण : ” ज्यांनी केवळ फलकावर आपले मोठे फोटो छापण्याचेच विकासकाम केले आहे , त्यांना जमिनीवरची कामे काय कळणार ? पालखी महामार्ग असो वा इतर रस्ते , हे सर्व सरकारी धोरण आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचे नियोजन आहे . मात्र , इथे ‘ क्रेडीट ‘ लाटण्यासाठी लोकांची चढाओढ सुरू आहे . अति तिथे माती या म्हणीप्रमाणे विकासाचा गंध नसताना केवळ फलकबाजी करणाऱ्यांना आता आवर घालण्याची वेळ आली आहे , ” अशा कडक शब्दांत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता समाचार घेतला . काल ९ जानेवारी रोजी , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ . अनिल जगताप यांनी संजीवराजेंच्याउपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला . या मेळाव्यात संजीवराजेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि माजी खासदारांच्या फलकबाजीवर सडकून टीका केली . संजीवराजेंचे ‘ राजकीय ‘ बाण ‘ : जिल्हा नियोजन मंडळाचा संबंध काय ? संजीवराजे म्हणाले की , ” जिल्हा नियोजन मंडळाची कामे मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्य , कलेक्टर आणि पालकमंत्री यांचा असतो . यामध्ये खासदारांचा त्यांच्या फंडाशिवाय कोणताही संबंध नसतो . तरीही कामाचे नाव आणि ठिकाण माहीत नसताना केवळ ‘ यांच्या प्रयत्नातून ‘ असे मोठे फलक लावले जातात . जर आम्ही केलेल्या कामांचे बोर्ड लावले असते , तर रामराजे आणि दीपक चव्हाणांच्या बोर्डानी तालुका भरला असता . “स्मशानभूमीच्या कामावर लावलेल्या फोटोंचा उल्लेख करत संजीवराजे म्हणाले , ” फोटो कुठे लावावा याचेही भान राहिलेले नाही . स्मशानभूमीत दहन होताना तो फोटोही जळेल इतक्या जवळ फोटो लावला आहे . पुढच्यास ठेच मागचा शहाणा , या न्यायाने जनतेने आता ही फलकबाजी ओळखली आहे . ” विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रकारः फलटण- आसू गिरवी रस्ता किंवा आदर्की रस्ता ही कामे आमदार दीपक चव्हाण यांच्या काळात आणि ‘ एशियन डेव्हलपमेंट बँक’च्या माध्यमातून झाली आहेत . त्याचे पुरावे आम्ही देऊ शकतो . मात्र , ज्यांना या कामांचा स्रोत माहीत नाही , ते आज मालकी हक्क सांगत फिरत आहेत . ‘ तालुका वाचवण्याची गरज ‘ ” तालुका सुसंस्कृतपणे पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे . पण जर कोणी श्रेयवादाच्या नावाखाली तालुक्याला मागे ओढत असेल , तर त्यांना वेळीच थांबवणे गरजेचे आहे . अन्यथा दिव्याखाली अंधार अशी आपल्या तालुक्याची अवस्था होईल , ” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला . या सभेने फलटणमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून , आगामी काळात ‘ दादा ‘ विरुद्ध ‘ राजे ‘ असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत .



