कामगारांच्या मोर्च्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही , म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? खाजगी सावकाराच्या विरोधात कारवाई करा , ही मागणी केल्यावर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? सरकार नेमकं कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड . प्रकाश आंबेडकर यांनी केला . महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा विधानसभेत संमत झाला आहे . प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत राजगृहावर पत्रकार परिषद घेऊन या विधेयकाला स्पष्ट विरोध दर्शवला . जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात करणारे असून , या विरोधात आम्ही न्यालयात लढा देणार.
ज्याच्याकडे शस्त्र , दारुगोळा आहे , त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकतात कारण , बेकायदेशीर मार्गाने तो राज्याला उलथू पाहतोय . बेकायदेशीर मार्गाने राज्य उलथवणाऱ्यांकडे शस्त्र , दारुगोळा आहे की नाही ते तपासले पाहिजे . शस्त्र , दारुगोळा आरएसएसवाल्यांकडे आहेत . त्यांनी सार्वजनिकरित्या ती जाहीर केली आहेत . त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाची कारवाई करणार आहेत का ? हा मोठा प्रश्न आहे . जर एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र , दारुगोळा याची मोहन भागवत , नरेंद्र मोदी , देवेंद्र फडणवीस शस्त्रांची पूजा करताय याविरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी म्हणून जाहीर करा , अशी मागणी केली , तर त्या माणसाच्या मागे या सर्व राजकीय विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे . तरच तुम्ही खऱ्या अर्थाने विरोधक आहेत , हे दिसेल . असे स्पष्ट मत ॲड . आंबेडकर यांनी व्यक्त केले .
सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके -४७ ( AK – 47 ) आणि टॉमी गन यांसारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत . भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे . असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली ? सरकार त्यांच्यावर ‘ अर्बन नक्षल ‘ म्हणून कारवाई करणार आहे की नाही ? ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या शस्त्रपूजेच्या फोटोंवर विरोधी पक्षांच्या शांततेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ” ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत , त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही ? ” असा सवालही त्यांनी केला आहे . कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे , परंतु एके -४७ आणि टॉमी गन यांसारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे . आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगतेय , त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी , असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे
जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले , लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही ‘ नौटंकी ‘ आहे . महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘ अघोषित आणीबाणी ‘ आहे . या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे . इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली , तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे . याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे , वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे . इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे , असेही आवाहन त्यांनी केले .



